छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ ने राजकीय खाते खोलले : ग्रामपंचायत निवडणुकीत २७ पैकी २० जागांवर विजय !
![Chhatrapati's 'Swarajya' opens political account: Victory in 20 out of 27 seats in Gram Panchayat elections!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Swarajya.jpeg)
पुणे : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यानंतर लगेचच लागलेल्या ग्रामपंयात निवडणुकीत राजकीय खातेही खोलले आहे. संघटनेकडून लढलेल्या २७ उमेदवारांपैकी २० उमेदवारांनी विजय खेचून आणला असून, ही राजकीय विजयाच्या वाटचालीचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने एकूण २७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी २० जागांवर ‘स्वराज्य’चे कार्यकर्ते विजयी झाले असून उर्वरित सात जागा या केवळ एक ते चार मतांच्या फरकाने निसटल्या आहेत. तसेच, थेट जनतेतून सरपंच पदाकरीता लढविलेल्या तीन जागांवर ‘स्वराज्य’ चे कार्यकर्ते सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. गणेशगाव, जातेगाव, सारूळ, जऊळके दिंडोरी, नागलवाडी, गंगावरे – सावरगाव अशा एकूण पाच ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्य संघटनेचे सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये महिलांचा समावेश बहुतांश प्रमाणात आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय हे कार्यकर्त्यांचेच आहे.
पहिल्याच टप्प्यातील हा विजय निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्व विजयी उमेदवार, विजयासाठी झटलेले स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर, त्यांचे सर्व सहकारी, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन. जनतेला ‘स्वराज्य’ कडून मोठ्या अपेक्षा आहेत, हेच या विजयातून दिसून येते. या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने स्वराज्य ची भावी राजकीय वाटचाल कशी असेल, याचे स्पष्ट संकेत या विजयाने दिलेले आहेत.
– छत्रपती संभाजी राजे.