‘मी चॅलेंज देऊन सांगतो; अजित पवार मुख्यमंत्री..’; छत्रपती संभाजीराजे यांचं सूचक विधान
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर शिंदेगट आणि भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं विरोधी पक्षातील नेत्यांकडून बोललं जात आहे. दरम्यान, यावरून स्वराज्य पक्षाचे नेते माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं विधान केलं आहे.
स्वराज्य पक्षाचा काल मुंबईत जंगी मेळावा पार पडला. यावेळी संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठी भविष्यावाणी केली आहे. ते म्हणाले, मला मोठा प्रश्न पडलाय हे तिघे लढणार कसे? आम्हाला बरं आहे, त्यातली आमच्याकडं येतील. हे सगळं गणित लोकसभेसाठी आहे. सगळं झालं की हे सगळे मोठ्या काकाकडे जाणार. मी त्यांच्यावर बोलणार नाही. कारण ते माझे संस्कर आहेत.
हेही वाचा – एकनाथ शिंदे-अजितदादांनी चौकशीच्या भीतीनं गुडघे टेकले; सामनातून टीकास्त्र
अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सगळं ठरलेलं आहे, असं सांगतानाच हिंदुत्वाची युती आणि राजकीय युती हे काय असते? यातील फरक शोधण्यासाठी मला डिक्शनरी घ्यायची आहे. सत्ता मिळवणम्यासाठी सर्वांना फोडायचं आणि मजा घ्यायची. हेच राज्यात सुरू आहे. पण स्वराज्य पक्ष कुणाला फसवणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. लोकांना फसवण्यासाठी नाही. ते आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजे म्हणाले.
येत्या २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टाळ्या वाजवून चालणार नाही. पैसे घेऊन चालणार नाही. आपल्याला वेगळं काही करायचं आहे. आपला भारत महान आहे. महाराष्ट्र वेगळा आहे. आपण काय करू शकतो हे दाखवणार की नाही? असा सवाल करतानाच मी कुणावर टीका करत नाही. पण टीका करायला भाग पाडू नका. आम्हला डिवचू नका. आम्ही खानदानी आहोत. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.