मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, ‘झुंडशाहीने नियम..’
![Chhagan Bhujbal said that I do not think that Maratha community has won](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
मुंबई | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं आहे. यावरून, मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु, मला तसं काही वाटत नाही. अशा रितीने झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. आम्हीही मंत्रिपदाची शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करू आणि निर्णय घेऊ, कोणाच्याही बाजूने निर्णय घेणार नाही, असं म्हटलं होतं. आम्ही सर्व मंत्रिमंडळाने तशी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या एक अधिसूचना काढली आहे. याचं नंतर कायद्यात रुपांतर होईल. तत्पूर्वी १६ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – ‘शिंदे साहेब, उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका’; मनोज जरांगे पाटीलांची विनंती
महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मी आवाहन करतो. लाखोंच्या संख्येने या हरकती पाठवाव्या. आम्ही लाखोंच्या संख्यने सरकारला अशा हरकती पाठवू. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकती पाठवाव्या. जेणेकरून सरकारला कळेल की याची दुसरी बाजूदेखील आहे. इतरांचं काहीतरी मत आहे. नुसतं एकमेकांवर ढकलून, चर्चा करून काहीही होणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागेल, असंही छगन भुजबळ म्हणाले.