‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..’; भाजपा नेत्याचं खुलं आव्हान

मुंबई | कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात भाष्य केरत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा खोचक सल्ला दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. कारण कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विधानसभेच्या सभागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा अपमान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहावं आणि सांगावं की आम्ही इंडिया आघाडीत राहू इच्छित नाही. मात्र, उद्धव ठाकरे असं करणार नाहीत.
हेही वाचा – राज्यात MBBS परीक्षांचा खेळखंडोबा: चारही पेपर फुटले; प्रश्नपत्रिका बदलण्याची नामुष्की
उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत जे विचार होते ते विचार उद्धव ठाकरे यांनी बाजूला केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनाला विचारलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.