पॉलिटिक्सच्या खिचडीमुळे रद्द झालं जात प्रमाणपत्र, नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई |
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
नवनीत राणा म्हणाल्या, “मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचला नाही. जश्या बातम्या माध्यमं देतात. तशी बातमी माझ्यापर्यंत पोहचली. गेल्या आठ वर्षापासून या प्रकरणात आम्ही भांडत आहोत. २०१२ पासून विरोधक माझ्या जात प्रमाणपत्राच्या मागे होते. त्यांना कागदपत्रे दिल्यानंतर सुद्धा त्यांनी हायकोर्टात अपील केली. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी कमीटी बसवली. कमीटीने जात प्रमाणपत्र दिले. त्यानंतर मी निवडणूक लढले. त्यानंतर ते पुन्हा हायकोर्टात गेले. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात देखील जाईन. मला न्यायावर विश्वास आहे”
- शिवसेनेवर केली टीका
” या प्रकरणात कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. गेले ८ ते ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. अचानक न्यायालयाचा निर्णय येणं म्हणजे यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली आहे” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “महिलेला खूप परिश्रम करावे लागतात. ते मी गेल्या ९ वर्षापासून केले आहेत. न्यायालयाने मला ६ आठवड्यांचा वेळ दिला आहे. कोणत्या कारणामुळे प्रमाणपत्र रद्द केलं. त्यावर मी अभ्यास करेन. मला न्यायावर आणि माझ्या कामावर विश्वास आहे”