केंद्र सरकारचा राहुल गांधी यांना सल्ला, …अन्यथा देशहितासाठी भारत जोडो यात्रा पुढे ढकला
![Central Govt advice to Rahul Gandhi, …otherwise postpone Bharat Jodo Yatra for national interest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Bharat-Jodo-768x470.png)
नवी दिल्ली : चीनमधील कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून भारतासह जगभरात त्यादृष्टीने खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने सर्व राज्यांना नव्याने सूचना जारी केल्या आहे. या पार्श्वभूमी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचे एक पत्र समोर आले आहे. कोरोनासंदर्भात त्यांनी हे पत्र काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लिहिले आहे. भारत जोडो यात्रेत कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे, अन्यथा देशहितासाठी यात्रा पुढे ढकला, असा सल्ला या पत्रातून देण्यात आला आहे.
जगभरात कोरोनाची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चीनबरोबरच अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. विविध देशांमध्ये आठवड्याभरात कोरोनाचे तब्बल 36 लाख 32 हजार 109 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा धोका पाहता भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा कोरोनाविरोधात अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आज, बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी विशेष बैठक बोलावली आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल पत्रही लिहिले आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि मास्क-सॅनिटायझरचा वापर करावा. या यात्रेत लसीकरण झालेल्या नागरिकांनाच सहभागी करून घ्यावे. या यात्रेत सहभागी होण्यापूर्वी आणि नंतर नागरिकांना आयसोलेट करण्यात यावे. हा नियम पाळण्यात काही अडचण आल्यास लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन देशहितासाठी ही यात्रा काही काळ पुढे ढकलली जाऊ शकते, असा सल्ला या पत्रातून राहुल गांधी यांना केंद्राने दिला आहे.