मातोश्री म्हणजे आई असू शकत नाही का? खासदार संजय राऊत यांचा प्रश्न
![Can't Matoshri be a mother? MP Sanjay Raut's question](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/raut-2.jpg)
मुंबई |
‘महाराष्ट्रात दानधर्म करण्याची परंपरा आहे. मातोश्रीला, म्हणजे आईला असू शकत नाही का? त्यांनी आईला दानधर्मासाठी काही पैसे दिले असतील. शिवसेनेत डायरी लिहिण्याची प्रथा नाही. ऐकून आम्हाला गंमत वाटली,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी यशवंत जाधव प्रकरणाबाबत दिली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यावर हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे भाष्य केले.
‘देशाच्या राजकारणातील दोन किंवा तीन डायऱ्या आम्हाला माहिती आहेत. या डायऱ्यांमध्ये गुजरातपासून इतरांपर्यंत कोट्यवधी कोणाला मिळाले, याच्या नोंदी होत्या. त्याची सीबीआय चौकशी झाली होती. तेव्हा सीबीआयने अशा डायऱ्या विश्वास ठेवण्यायोग्य नसतात, असे सांगितले होते. डायरी हा पुरावा असू शकत नाही. खोट्या डायऱ्या तयार केल्या जाऊ शकतात. जर भाजपच्या प्रेरणेने तपास यंत्रणा खोटे पुरावे, गुन्हे, खटले तयार करत असतील, तर कशावरून खोट्या डायऱ्या केल्या नाहीत. माझा भाजपच्या कार्यपद्धतीवरच संशय आहे. ते काहीही खोटे तयार करू शकतात. बनावट माणसे, कागदे काहीही करू शकतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात,’ अशी टीका राऊत यांनी केली.
- ‘उद्धव यांना खडसावले असते’
मुंबई : ‘शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलघेवडेपणाबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खडसावले होते. दोन वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता घोषणा पुरे, कामाला लागा, असा जाहीर सल्ला त्यांनी जोशी यांना दिला होता. आज बाळासाहेब असते, तर तोच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता,’ अशा शब्दांत भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी टीका केली.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. ‘सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे यांनी गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे, यातच वेळ वाया घालवला आहे; पण टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची राज्याच्या नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे. समस्यांना तोंड देताना नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे, असेही ते म्हणाले.