#Breaking! ‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातली महाविद्यालयं…
मुंबई |
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. करोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर लवकरच सुरू होत आहेत. मात्र यासाठी विद्यार्थी तसंच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, “२० ऑक्टोबर पासून राज्यातील कॉलेज सुरु होणार आहेत. मात्र करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठरवलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”.
ते पुढे म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी. करोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वसतिगृहेसुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत”.