सीमेवर तणाव ः महाराष्ट्राच्या नेत्यांवर कर्नाटकच्या पोलिसांचा लाठीचार्ज
![Border tension: Maharashtra leaders lathi-charged by Karnataka police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Maharashtra-Karnatak-Boarder.jpg)
कोल्हापूर ः महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या महामेळाव्याला जाताना महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आले. यावेळी मविआच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दीड तास तणावपूर्ण वातावरण होतं. तसंच, या तणावपूर्ण वातावरणात कन्नाडिगांविरोधात रस्त्यावरच आंदोलन करण्यात आले.
बेळगाव येथील मराठी भाषिकांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी बांधवांसाठी महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. यासाठी महाविकास आघाडीचे नेते कागल येथे एकत्र जात होते. माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
यावेळी कागलच्या मध्यवर्ती बस स्थानकातून ते कर्नाटकच्या दिशेने निपाणीकडे चालत निघाले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा रोखला.
मोर्चा रोखताना हसन मुश्रीफ यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आला दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसंच, कर्नाटक पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर याच परिसरात नेत्यांनी भाषणेही केली. भाषणांनंतर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडलं असं हसन मुश्रीफ म्हणाले.
‘बेळगाव येथे मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जात असताना कोगनोळी टोल नाक्याजवळ आल्यावर शांततेच्या मार्गाने मोर्चे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला केला. एका लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होत असेल तर तेथील मराठी भाषिकावर किती अन्याय व अत्याचार होत असेल याचा विचार केला पाहिजे. लवकरात लवकर बेळगाव बिदर निपाणी कारवार सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ असं हसन मुश्रीफ म्हणाले.