विधान परिषदेसाठी भाजपा वेगळा डाव खेळणार, दानवेंचे मोठे वक्तव्य
औरंगाबाद : ‘विधान परिषद निवडणुकीसाठी विचारपूर्वक पाच उमेदवार दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील आमची रणनीती विरोधकांना लक्षात आली आहे. ते आता त्याच रस्त्याने जातील. त्यामुळे आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार आणि भाजपचे सर्व उमेदवार जिंकणारच,’ असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. कामानिमित्ताने विभागीय आयुक्तालयात दानवे आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
दानवे म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘शतरंज’चा खेळ खेळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा पराभव केला. आता तोच खेळ भाजप खेळणार नाही. महाविकास आघाडीला आमचा डाव माहिती झाल्याने ते आता त्याचे रस्त्याने जातील. त्यामुळे आता आम्ही वेगळा डाव टाकणार आहे. वेगळ्या मार्गाने जाणार. त्यासाठी अंतर्गत नियोजन सुरू असून भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील.’ ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही तर बिनविरोध निवडणूकीचा प्रस्ताव होता का?’ असा सवाल केला असता दानवे म्हणाले, ‘असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे गेला नव्हता. कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही कशाला काही सल्ला देणार. खडसेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेला पराभूत करण्याचा हा डाव आहे.’
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप सोडावे व नवीन पक्ष स्थापन करावा, असे विधान खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, दानवे म्हणाले, ‘राजकारणात दुसऱ्यामध्ये कसा खोडा घालता येईल, असा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. खासदार जलील म्हटल्यावर पंकजा मुंडे प्रतिसाद देतील, असे नाही. असे कोणाच्या बोलण्यावर त्या निर्णय घेतली असे नाही. पंकजा मुंडे पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असून, पक्ष त्यांच्याबाबत योग्य विचार करील, असे त्यांनी नमूद केले. जालन्यातील ‘जल आक्रोश’ मोर्चावर विरोधकांनी टीका केली आहे, यावर बोलताना दानवे यांनी विरोधकांनी बुधवारची सभा पाहिली. याबाबत त्यांचे धन्यवाद असे म्हणत अधिक भाष्य टाळले.