भाजपची वाटचाल संघाला मान्य आहे का ठाकरेंचा सवाल
निष्ठावंतांना डावलून गद्दारांच्या पोरांना उमेदवारी
कल्याण : कल्याण लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उध्दव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. मुसळधार पाऊस ही आपल्या विजयाची नांदी आहे. या असल्या पावसात आपली मशाल कधीच विझणार नाही. याऊलट ती अधिक प्रज्वलीत होऊन भाजपसह कल्याण लोकसभेतील गद्दारांना आता गाडून टाकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजपची युती अभेद ठेवण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाजन यांच्यामुळे भाजपला ओळख मिळाली. त्याच महाजन यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली. म्हणजे निष्ठावानांना डावलायचे आणि कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला उमेदवारी द्यायची. भाजपची ही वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, असा सवाल उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी डोंबिवलीत मुसळधार पावसात झालेल्या प्रचार सभेत केला.
शिवसैनिकांची तुफान गर्दी, भर पावसात ठाकरेंची सभा; मोदींवर हल्लाबोल, भाषण जसंच्या तसं!
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्यावर घराणेशाहीच्या आरोप करणाऱ्या भाजपने आता उपरे, गद्दारांची पोरं का कडेवर घेतली आहेत. भाजपची ओळख प्रमोद महाजन यांच्यामुळे आहे. आता महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. म्हणजे भाजपचे दोन खासदार होते, त्यावेळी भाजपच्या वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या महाजन यांच्या निष्ठावान मुलीला घरचा रस्ता आणि गद्दारांच्या पोरांना हे कडेवर घेऊन निवडून आणण्यासाठी चालले आहेत. मग ही भाजपची वाटचाल संघाला मान्य आहे का, असा प्रश्न उध्दव यांनी केला.