“अण्णा हजारेंमुळेच त्यांनी….;” ममता बॅनर्जींचा आम आदमी पार्टीवर निशाणा
गोवा |
गोवा विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांशिवाय ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनेही गोव्याच्या राजकारणात प्रवेश केलाय. निवडणुकांना अजून वेळ असला तरी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी हे दोघेही राज्यातील निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून एकाच दिवशी गोव्यात दाखल झाले. ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. तर, राहुल गांधी देखील सध्या गोव्यात आहेत. यावेळी ममता बॅनर्जींनी भाजपा, काँग्रेससह आम आदमी पक्षावर निशाणा साधला.
ममता म्हणाल्या, “मोदीजी काँग्रेससाठी फार शक्तिशाली आहेत. मात्र, काँग्रेस या लढ्याबद्दल गंभीर नाही. इतकंच नाही तर काँग्रेस आणि भाजपाने एकमेकांशी तडजोड करण्यावरही त्यांनी भर दिला. काँग्रेसच्या कमकुवतपणामुळेच आज मोदी सत्तेत आहेत. तसेच टीएमसी गोव्यातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षासोबत जाण्याच्या विचारात नाही. या पक्षांमध्ये आम आदमी पक्षाचाही समावेश आहे. माझं आम आदमी पक्षावर प्रेम आहे. त्यांनी केवळ अण्णा हजारेंमुळेच दिल्ली जिंकली. मी त्याला पंजाबला जाण्यापासून रोखले नाही, तर ते मला गोव्यात येण्यापासून का थांबवतील? कोणीही कुठेही निवडणूक लढवू शकतो. मी केवळ माझ्या पक्षाबद्दल आणि स्थानिक पक्षाबद्दल सांगू शकते ज्यांना भाजपाविरोधात लढायचे आहे.” तुणमूल गोव्यात प्रादेशिक पक्षांशी युती करण्यास तयार आहे, असं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याशी भेट घेतली. “आम्ही विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केली की आम्हाला मतांचे विभाजन टाळायचे आहे. आता ते काय निर्णय घेतात त्यांच्यावर अवलंबून आहे.” विजय सरदेसाई यांनी अद्याप टीएमसीसोबत जायचे की नाही यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.