भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही? बच्चू कडूंचा सवाल
![Bacchu Kadu said why not a single leader of BJP is being investigated by ED](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Bacchu-Kadu-2-780x470.jpg)
मुंबई : ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, आता थेट सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही? असा सवाल प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) ताळ्यावर आणलं पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडलं पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचं काहीच बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.
हेही वाचा – गूगल तुमचं Gmail अकाउंट बंद करू शकतं! कसे रोखायचे? वाचा..
मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण भाजपावाल्यांना माझा प्रश्न आहे. माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.