२४ डिसेंबर की २ जानेवारी? सरकारला दिलेल्या मुदतीबाबत बच्चू कडूंचा खुलासा; म्हणाले..
![Bacchu Kadu said that the government should start the work according to the 24th date](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Bacchu-Kadu-1-780x470.jpg)
मुंबई : मराठा आराक्षासंदर्भात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी काल उपोषण मागे घेतलं. मात्र, राज्य सरकारला २४ डिसेंबरची की २ जानेवारीची? मुदत दिली आहे. याविषयी संभ्रम आहे. दरम्यान, प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी यावर खुलासा केला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, आंदोलनस्थळी १० ते १५ मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर लेखी स्वरूपात शासन निर्णयात सुधारणा करायची आहे. आम्ही ठरवलं होतं की तज्ज्ञ समितीकडूनच चर्चा व्हायला हवी. त्यामुळे माजी न्यायाधीश गायकवाड आणि त्यांच्यासह आणखी दोन जण होते. त्यात सगळं व्यवस्थित लिहून घेतलं गेलं. त्यावर आता सरकार पावलं उचलेल. ७५ वर्षांपासून सगळ्याच पक्षांनी मराठ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता कोणत्याच पक्षावर मराठ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता तारखांमागे तारखा दिल्या, तर दिरंगाई होईल, आचारसंहिता लागेल की सरकारच राहणार नाही असं मराठा समाजाला वाटतंय. २४ तारीख आहे त्यानुसारच सरकारनं काम सुरू करावं.
हेही वाचा – येत्या ४८ तासांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
दिवसाचे २४ तास काम करणं गरजेचं आहे. मी जरांगेंना सांगत होतो की आपल्याला ३ महिने तरी लागतील. पण मला लक्षात येतंय की जानेवारीत लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत हा निर्णय झाला पाहिजे. जर त्याआधी निर्णय झाला नाही तर पुन्हा मोठी अडचण सत्ताधारी पक्षांसाठी निर्माण होऊ शकते. मग मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सुट्या वगैरेंमध्ये २० दिवस तरी जातील. त्यामुळे आपण वेळ वाढवून मागत होतो. पण आचारसंहिता लागण्याच्या १० दिवस आधी हा निर्णय लागायला हवा. सरकारनं १५-२० दिवस व्यवस्थित काम करावं. नंतर तो आढावा जरांगे पाटलांसमोर ठेवावा आणि त्यानंतर सरकारनं १०-१५ दिवसांनंतर तारीख वाढवून मागावी, असं बच्चू कडू म्हणाले.
७५ वर्षांपासून मराठ्यांवर अन्याय होत आहे. मी तर म्हणतो अनुशेषासह त्यांना जागा द्यायला हव्यात. महात्मा फुलेंनी सांगितलंय की मराठा म्हणजे तेली, माळी, कुणबी, महार, धनगर अशा सगळ्या अठरापगड जातीचे लोक म्हणजे मराठा. त्यामुळे हा समूहासाठी वापरला जाणारा शब्द आहे. मग मराठा हा कुणबी नाही तर कोण आहे? तुम्ही अनेक जाती ओबीसीमध्ये टाकल्या. साधा राज्य मागासवर्गीय आयोगानं शिफारस जरी केली तरी आपण ओबीसींमध्ये जाती समाविष्ट केल्या आहेत. मग मराठ्यांना इतका वेळ का लागतोय? त्यामुळे जाणीवपूर्वक सगळ्या पक्षांनी राजकारण केलं, असंही बच्चू कडू म्हणाले.