‘आमचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा युतीला नाही’; बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य
आमचे नाव प्रहार आहे, आम्ही वार करतो
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पूर्ण झाली आहे. आता, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची?, नाही करायची?, किती जागा देणार?, नाही देणार? त्याचं अजून काहीही ठरलेलं नाही. आगामी काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, पुढच्या दीड वर्षात काय होणार? हे काही आताच सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. तीन वेळा शपथविधी झाले. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार? हे आताच सांगता येत नाही, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ऑफर केलेल्या जागांबाबत विचारलं असता, हे विधान त्यांनी चुकून केलं का, भाजपाची हीच भूमिका आहे का, हेही तपासलं पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांच्यावर देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत, अशी टीका केली होती. यावरून बच्चू कडू म्हणाले की, आमचे नाव प्रहार आहे. आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही.