‘१७ रूपयांची साडी देऊन मेळघाटचा अपमान केला’; बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका
![Bacchu Kadu said that Melghat was insulted by giving a saree of 17 rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Bacchu-Kadu-780x470.jpg)
अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपाने लोकसभेचे तिकीट दिलं आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेशदेखील केला. यानंतर आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार, असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. बच्चू कडू यांनी नुकत्याच एका प्रचारसभेत केलेल्या भाषणात राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, पैसा आईची सेवा करू शकत नाही. त्यासाठी चांगलं अंतर्मन तयार झालं पाहिजे, चांगले विचार पाहिजेत. त्यांनी (नवनीत कौर राणा) १७ रुपयांची साडी देऊन या मेळघाटची बेईज्जती करून टाकली. दोन कोटी रुपयांच्या कारने फिरायचं आणि १७ रुपयांची साडी देऊन लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु, मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला ही व्यवस्था तोडून टाकावी लागेल. त्यासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
आम्हाला काहींचा निरोप होता की तटस्थ राहायचं, न इधर, ना उधर… परंतु, मला सांगायचं आहे की, निवडणुकीच्या वेळी वाटलेली १७ रुपयांची साडी लोकांचं मतपरिवर्तन करू शकत नाही. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास आहे. आपल्या छत्रपतींनी अनेक आव्हानं तोडून, मोडून परतवून लावली होती. हा संत गाडगेबाबांचा जिल्हा आहे. इथले लोक १७ रुपयांच्या साडीमुळे गुलामीकडे जाणार नाहीत, असंही बच्चू कडू म्हणाले.