राज ठाकरेंच्या टीकेला भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, घरात बसून..
राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्व देत नाही
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वाभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार म्हणाले की, घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का?, असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – भाजप नेत्यावर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रूपये मिळवा; राष्ट्रवादीकडून फलकबाजी
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? राज ठाकरे हे केवळ स्वत:च अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्व देत नाही, असंही आशिष शेलार म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत असतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणार होणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.