‘काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण’; भाजप नेत्यांचा टोला
![Ashish Shelar said that the promise given by the Congress in the manifesto is the food of a liar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Ashish-Shelar-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, गॅस सिलिंडर ४५० रुपयांमध्ये, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावरून भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसचा फसवेगिरीचा धंदा सुरु झाला असून काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील खोटेपणा आता स्पष्ट होऊ लागला आहे. ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देऊ सांगणाऱ्या काँग्रेसने ज्या राज्यात त्यांचे सरकार आहे त्या राज्यात त्यांनी गॅस सिलेंडरचा एक रुपयाही कमी केला नाही. त्यांचे सरकार असणाऱ्या राज्यातदेखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाही. कर्नाटकसह ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, तेथे गॅस सिलेंडरवरील सबसिडी सरकारने भरावी, अशा पद्धतीचा निर्णय केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे हे आश्वासने म्हणजे लबाडाघरचे जेवण होय.
हेही वाचा – ‘बंडखोरी करु नका’; एकनाथ शिंदे यांचं आवाहन
नाना पटोले हे एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते निर्बुद्ध नसतील असे आम्हाला वाटत होते. पण संवेदनशीलतेचा कळस त्यांनी गाठला. एक व्यक्ती स्वत:च्या जीवनाची लढाई लढत आहेत आणि नाना पटोले हे त्याबद्दल राजकारण करत आहेत. अशा पद्धतीचे राजकारण फक्त काँग्रेस आणि नाना पटोले यांनाच शोभू शकते, असं आशिष शेलार म्हणाले.
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या २०० शिवसैनिकांनी आज भाजपात प्रवेश केला. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी आशिष शेलार बोलत होते. ते म्हणाले, “ठाकरे गटाने विचारधारा जेव्हापासून सोडली, तेव्हा पासून हिंदुत्वावादी शिवसैनिकांची घुसमट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन आज अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपात चांगले पद आणि मानसन्मान मिळेल, असंही आशिष शेलार म्हणाले.