‘आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं जातं, पण..’; निवडणूक रोख्यांबद्दल ओवैसीचं महत्वाचं विधान
Asaduddin Owaisi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाप्रमाणे आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली. यावरून एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमधून पुन्हा एकदा इम्तियाज जलील निवडणूक येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून महत्वाचं भाष्य केलं आहे.
खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, महात्मा गांधींना ज्याने ठार केलं त्या नथुराम गोडसेचा जन्म कुठे झाला? मुंबईत जेव्हा दंगल उसळली आणि हिंदू मुस्लिम मारले गेले त्यांना मारणारे कुठे जन्माला आले होते? भिवंडीत हिंदू-मुस्लिम मारले गेले त्यांना मारणारे कुठे जन्माला आले होते? याचाही विचार करावा लागेल. आम्हाला शांतता हवी आहे, हिंसा नको.
हेही वाचा – निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण
प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. मी आधीही हेच सांगत होतो आणि आत्ताही हेच सांगतो आहे की इम्तियाज जलील चांगलं काम करत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी आणि पक्षासाठीही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे औरंगाबादमधून पुन्हा एकदा इम्तियाज जलील हेच दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येतील.
मोठमोठ्या कंपन्यांनी ८ हजार कोटी मोदींच्या पक्षाला दिले. १७०० ते १८०० कोटी हे काँग्रेसला दिले. बिजू जनता दल, समाजवादी पक्ष तसंच इतर पक्षांनाही हे पैसे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देण्यात आले. आम्हाला बी टीम म्हटलं जातं पण आम्हाला तर एक पैसाही मिळाला नाही, असंही ओवैसी म्हणाले.