‘शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा..’; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा
![Arjun Khotkar said that BJP should maintain friendship with Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Eknath-Shinde-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | लोकसभेच्या जागावाटपाचा महायुती मधील तिढा अजूनही सुटलेला नाहीये. यामध्ये नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह काही जागांचा तिढा आहे. या जागावाटपावरून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होईल, असं ते म्हणाले.
अर्जुन खोतकर म्हणाले की, शिवसेनेचे सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्याबरोबर आले आहेत. त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे. मला असे वाटते की, तुम्ही (भाजपाने) त्या जागा सोडून वाद घातला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, नाशिक या जागा शिवसेनेच्या आहेत. तरीही तुम्ही या जागा मागत असाल तर सहाजिकच शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड निर्माण होईल. आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीने दबावतंत्राने मागत असतील तर हे फार वाईट असून याचा संदेश चांगला जात नाही.
हेही वाचा – महायुतीत मिठाचा खडा, नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूंचा विरोध कायम
मी देखील पक्षाकडे बोललो होतो की, भारतीय जनता पक्षाने २० जागा जाहीर केल्या तर आपणही आपल्या १२ किंवा १३ खासदारांच्या जागा जाहीर केल्या पाहिजे होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे ठरवून दिले ते केले. पण शिवसेनेच्या ज्या जागा होत्या, त्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हव्या होत्या. आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना चारवेळा शक्तीप्रदर्थन करावे लागते आहे. त्यामुळे लोकांमध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर यातूनच पुढे काहीतरी वेगळे घडते, असं खोतकर म्हणाले.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने नऊ मतदारसंघातील उमेदारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलीक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगले येथून धैर्यशिल माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.