पुणे-लोणावळा लोकलसाठी संतप्त प्रवासांनी घेतली उच्च न्यायालयात धाव
गेली 10 वर्षे रेल्वे मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी व मध्य रेल्वे प्रशासनाकडे दाद मागूनही अपयश
पुणे : पुणे लोकलच्या फेऱ्या दुपारी तीननंतरही सुरू ठेवाव्यात, चाकरमान्यांसह सामान्य प्रवाशांना एक्स्प्रेसमधून प्रवासाची अनुमती द्यावी, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना तळेगाव दाभाडे येथे थांबा द्यावा, या मागण्यांसाठी गेली दहा वर्षे रेल्वे मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी व मध्य रेल्वे प्रशासनाकडे दाद मागूनही अपयश आल्याने अखेर संतप्त प्रवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पुणे- मुंबई – पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या पुणे प्रवासी संघाचे प्रतिनिधी शेखर डेरे व इतर ५० प्रवाशांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नितेश नेवशे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
पुण्याहून मुंबईकडे सकाळीच सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या एक्स्प्रेस गाड्या रवाना होतात. या गाड्यांमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, सकाळी ८.३० वाजता प्रगती एक्स्प्रेस गेल्यानंतर दुपारी मुंबईला जाण्यासाठी एकही एक्स्प्रेस गाडी नाही. कोणार्क व हैदराबाद एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या दोन गाड्या दुपारी २ वाजता आहेत. मात्र, या गाड्यांतून नियमित पासधारक व इतरांना प्रवासाची अनुमती नाही.
पुणे-लोणावळा-पुणे लोकल दोन्ही बाजूंनी पहाटे पाचला सुरू होते. मात्र, ११.३० पर्यंतच लोकलच्या फेऱ्या होतात. त्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत एकही लोकल नाही. दुपारी लोकल सुरू ठेवावी, या प्रवाशांच्या मागणीकडे मध्य रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे पुणे प्रवासी संघ हायकोर्टात गेला आहे, असे अॅड. नेवशे यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेने कलम १४ व २१ अंतर्गत प्रत्येकाला मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याचा दावा याचिकेत केला गेला आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा मात्र खा. श्रीरंग बारणे यांना अपयश
पुणे प्रवासी संघाच्या उच्च न्यायालयात दाखल याचिकेबाबत कल्पना नसल्याचे मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी सांगितले. पुणे- लोणावळा लोकल फेऱ्यांबाबत आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची अनेकदा भेट घेतली. दुपारी अडीचपर्यंतचा काळ गाड्यांच्या मेंटेनन्ससाठी असल्याने त्यावेळेत लोकल चालवता येणार नाही. एक्स्प्रेस गाड्यांना तळेगाव दाभाडे स्थानकावर थांबा देणेही शक्य नसल्याचे उत्तर दोन्ही मंत्र्यांनी दिल्याची हतबलता बारणे यांनी व्यक्त केली.
दुपारच्या वेळीच ही कामे सुरू असतात. त्यामुळे लोकल सुरु करता येत नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘दुपारच्या वेळी लोकल सुरु करण्यासाठी आत्तापर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. देखभाल-दुरुस्तीच्या वेळा ठरल्या आहेत. येत्या लोकसभा अधिवेशनात केंद्रीय मंत्र्यांची चर्चा करून यावर मार्ग काढणार आहे.
-श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा