‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची टीका
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडवलं, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेत अजित पवार गट यावर काय प्रतिक्रिया देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावरून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे कधीही स्वीकारू शकत नाही. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरू होत्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल, त्यांनी तो करावा.
हेही वाचा – ‘माझ्यासोबत दगा फटका झाला, राजकीय वनवास मिळाला’; पंकजा मुंडेंचं मोठं विधान
योगी आदित्यनाथ यांनी गोविंददेव गिरी महाराजांबद्दल काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. पण खरे शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवरायांच्या गुरू फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून संत तुकाराम यांनी कार्य केले, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?
समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.