‘CAA मागे घेण्याचा प्रश्नच नाही’; अमित शाह यांचं मोठं विधान
नवी दिल्ली | केंद्र सरकारने CAA अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. याच मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेतला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका अमित शाह यांनी मांडली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेतला जाणार नाही. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. हा कायदा मागे घेतला जाण्याचा काही प्रश्न नाही.
हेही वाचा – ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपाकडून तिकीट
विरोधी पक्षाकडे दुसरं काहीही काम उरलेलं नाही. विरोधी पक्षांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवरही संशय घेतला. १९५० पासून सांगितलं जात होतं की आम्ही कलम ३७० हटवणार. मात्र ते कलम मोदींनी हटवून दिलं जातं. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात २३ टक्के हिंदू होते. आज ३ टक्के हिंदू उरले आहेत बाकीचे हिंदू कुठे गेले? त्यांचं धर्म परिवर्तन करण्यात आलं. मोदी जे आश्वासन देतात ते आश्वासन पूर्ण करतात. त्यामुळे आम्ही सीएए कायदा मागे घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, असं अमित शाह म्हणाले.
ममता बॅनर्जींना हात जोडून विनंती करतो आहे की राजकारण करण्यासाठी खूप सारे मार्ग आहे. बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचं अहित करु नका. बांगलादेशातून जे बंगाली हिंदू आले आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आम्ही कायदा आणत आहोत. हिंदू-मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करुन ममता बॅनर्जी राजकारण करत आहेत. मला त्यांनी एक कायद्यातली एक तरतूद दाखवावी की जी नागरिकता हिरावून घेते. बंगालबाबत तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की लवकरच पश्चिम बंगालमध्येही लवकरच भाजपाचं सरकार येईल. ममता बॅनर्जी घुसखोरीचं समर्थन करणार असतील तर तिथे त्यांचं सरकार राहणार नाही, असंही अमित शाह म्हणाले.