पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपाला भाजपाचे प्रत्युत्तर!
![Amit Malviy Replied To Satyapal Malik Allegation On Pm Modi On Pulwama Attacked](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/narendra-modi-and-Satyapal-Malik-780x470.jpg)
दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मलिकांच्या आरोपांना आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरमध्ये अपमानित झालेले राज्यपाल आहेत. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे खोटे आरोप केले होते, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अमित मालविय यांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिकांनी अमित शाहांबाबत एक विधान केलं होतं. अमित शाहांनी मोदींचं डोकं फिरलंय असं म्हटल्याचं ते म्हणाले होते. मात्र, या मुलाखतीत सत्यपाल मलिकांनी हे विधान मागे घेतलं. याचा व्हिडीओ अमित मालविया यांनी ट्वीट करत मलिक हे कशाप्रकारे खोटं बोलतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मलिकांनी यापूर्वी अमित शाहांवर खोटे आरोप केले होते. अशा प्रकारचे आरोप करून मलिक स्वत:च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला होता.