अजितदादा, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासक नेमून सत्ता चालवताहेत !
![Ajitdada is appointing administrator in Pimpri-Chinchwad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Aap-Pcmc-e1654504233994.jpeg)
आम आदमी पाटीचा सवाल : पिंपरी-चिंचवडकरांना सुविधा देण्यास कोणी रोखलंय?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक नेमून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महापालिकेत सत्ता चालवत आहेत. सामान्य पिंपरी-चिंचवडकरांना सुविधा देण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे? असा सवाल आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.
निगडीतील पाटीदार भवन येथे आम आदमी पार्टीचा ‘स्वराज्य मेळावा’ मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी ‘आप’ चे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी-चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप पिंपरी-चिंचवड प्रमुख अनुप शर्मा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते रंगा राचुरे यांनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात तोफ डागत, स्थानिक तसेच राज्य पातळीवर सरकारच्या अकार्यक्षमतेची जाणीव करून दिली. मुख्य मुद्द्यांना बगल देत धार्मिक तेढ निर्माण करत सामाजिक वातावरण बिघडवून आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न सरकारे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपतर्फे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती देत राज्य आणि देश पातळीवर पक्षाची होत असलेली वाढ लक्षवेधी आहे. स्थानिक पातळीवर देखील पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेत घराघरापर्यंत पोहोचावं असं कार्यकत्यांना आवाहन केले.
टक्केवारीच्या राजकारणाची परंपरा राष्ट्रवादीचीच…
दोन दिवसांपूर्वी शहर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टक्केवारीच्या राजकारणावर टीका केली. मात्र, टक्केवारीच्या राजकारणाची परंपरा राष्ट्रवादी ची आणि तीच परंपरा भाजपाने पुढे सुरू ठेवली. त्यामुळे कमिशन आणि टक्केवारी साठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना कोणतेही निर्धारित मुदतीची बंधने नाहीत आणि अनेक प्रोजेक्ट प्रलंबित आहेत. त्याचे खर्च वाढविले जातात. भाजपा आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत, असा आरोप चेतन बेंद्रे यांनी केला आहे.
‘नागरिकांची सनद’ लोकांसमोर ठेवणार…
सर्वोपचार मोफत आरोग्य सेवा, पूर्ण दाबाने चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा,परिपूर्ण सुरक्षित रस्ते, सरकारी घरकुल योजना आणि निवारा हक्क इ मूलभूत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकांची सनद’ आम्ही जनतेसमोर सादर करणार आहोत. शहरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीला येत्या निवडणुकीत विजयी करावे,असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी निगडी येथील स्वराज्य निर्धार मेळाव्यात केले.