नटनट्यांचं राजकारणात काय काम? अजित पवारांचा कोल्हेंना खोचक टोला
![Ajit Pawar said what is the use of pranksters in politics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ajit-Pawar-1-1-780x470.jpg)
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात म्हणजेच शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मोर्चेबांधणी चालू केली आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अजित पवार म्हणाले की, अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं. एखादा नवीन माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो.
हेही वाचा – महायुतीत पडणार मिठाचा खडा? माढा लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा
उमेदवारी देऊन, प्रचार करून त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही. आता शिवजयंतीच्या दिवशी ते मला भेटले. मी त्यांना विचारलं, का हो डॉक्टर.. तुम्ही मागे म्हणाला होता की तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे. आता तुम्ही परत दंड थोपटले? तर मला म्हणाले, ‘दादा जरा वाटायला लागलंय की आपण परत उभं राहावं.’ पण असं कसं चालेल? मुळात आपल्या मतदारसंघातील प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत, असंही अजित पवार म्हणाले.