“बागेश्वर बाबा कोण आहे? अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी”; अजित पवार
मुंबई : महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, शेतकर्यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी केली आहे.
बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, एका कार्यक्रमात बाबा धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. त्याची पत्नी त्याला रोज काठीने मारायची. संत तुकारामांना कुणीतरी विचारलं होतं की तुझी बायको सगळ्यांना मारते आणि लाज नाही वाटत? ज्यावर संत तुकाराम म्हणाले होते की, ही देवाची कृपा आहे की मला मार खाणारी पत्नी मिळाली आहे. जर आपल्याला प्रेमळ पत्नी मिळाली असती तर आपण देवावर प्रेम केले नसते, आपण आपल्या पत्नीच्या प्रेमात पडलो असतो.