‘महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील’; अजित पवारांचा दावा
मुंबई : देशात दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काळा पैसा बाहेर काढण्याची भूमिका असताना देशातून हवालामार्फत साडेचारशे कोटी रुपये बाहेर जाण्याच्या बातम्या समोर येत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. जर नोटाबंदी करायची होती तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे त्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायची गरज नव्हती असेही अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी संदर्भात कोणाताही निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. ते निर्णय तीनही पक्षाला मान्य असतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरुन कोणीही वेगळा अर्थ काढू नये. महाविकास आघाडीची एकजूट राहावी अशी आमची भूमिका आहे. स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो की महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील, असा ठाम विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
समीर वानखेडे यांच्या प्रकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही स्पष्टपणे याविषयी भूमिका मांडली. मात्र त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता जनतेसमोर सीबीआयच्या माध्यमातून सत्य बाजू येत आहे. केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. अशा चौकशींवर अनेक सत्ताधारी पक्षामध्ये गेलेल्या आमदारांनी आणि खासदरांनी जे वक्तव्य केले आहेत ते जनतेने पाहीले. वास्तविक सत्ताधाऱ्यांकडून द्वेष भावानेने, राजकीय सूडबुद्धीने या चौकशीसाठी कोणाला बोलवता येऊ नये असे मत अजितदादांनी व्यक्त केले. अशा यंत्रणांच्या चौकशीसाठी कोणी गेल्यास त्यावर कोणतेही वक्तव्य माझ्याकडून करण्यात आलेले नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र या गोष्टीतून काही लोक जाणीवपूर्वक वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र असा चौकशींवर मी कोणतेही वक्तव्य करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडली.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता’; रूपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप
त्र्यंबकेश्वर घटनेसंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून माहिती घेतील. यापूर्वीही अकोला, अहमदनगर, औरंगाबाद याठिकाणीही दंगलीच्या घटना घडल्या. यामध्ये कोणीही भावनिक मुद्दा करू नये, राजकारण आणू नये, जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये असे आवाहन अजितदादांनी केले आहे. स्थानिक लोकांनाही त्याविषयी आवाहन केले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असतात. सध्याचे गृहमंत्री याविषयी पाठपुरावा करत असले तरी ते नियंत्रणात येत नाही अशी टिपण्णी अजितदादा यांनी सरकारवर केली. अशा दंगलीमुळे गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला योग्य कारवाई करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
काही लोकांना महागाई, बेरोजगारीचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी दुसरा मुद्दा मिळत नाही. परंतु आता कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांना भिती वाटत असावी. त्यामुळे जनाधार आपल्या बाजूने येण्यासाठी असा प्रयत्न काहींकडून होत असावा अशी शंका अजितदादांनी उपस्थित केली. आशिष शेलार यांनी गाईच्या हत्येच्या व्हिडीओ दाखवला. ही घटना कर्नाटकात घडल्याचा त्यांनी दावा केला. मात्र तो व्हिडिओ मणिपूरचा निघाला. अशाप्रकारे सत्ताधारी पक्षातील नेत्याने एकादा दावा करताना त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले.