‘मुख्यमंत्री करणार म्हणाले असते तर पक्षच आणला असता’; अजित पवारांचं मोठं विधान
![Ajit Pawar said that if the Chief Minister had said to do it, the party would have brought it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Ajit-Pawar-1-780x470.jpg)
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं. मला सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती, असं अजित पवार यांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज एक अगळा वेगळा कार्यक्रम ठाण्यात पार पडत आहे. सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत पहिलाच कार्यक्रम हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा पार पडत आहे. याचं सर्व श्रेय हे प्रा.प्रदीप ढवळ आणि डॉ. भालेराव यांना जातं. कारण कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो आणि कोणीतरी त्यामध्ये स्वत:ला झोकून द्यायचं असतं. त्यावेळी अशा प्रकारचं एखादं पुस्तक तयार होतं. या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आजपर्यंत खूप काही घडलेलं आहे.
हेही वाचा – रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, RBI चं धोरण जाहीर
एका शेतकरी कुटुंबातील मुलगा हा या परिसरात येतो काय? कामाला सुरुवात करतो काय? आणि त्यानंतर नगरसेवक होतो काय? त्यानंतर २००४ साली आमदार होतो काय? त्यानंतर एकदाही मागे ओळून न पाहता सातत्याने त्यांना यश मिळत जातं काय? अर्थात यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि त्यांचे स्वत:चे कष्ट, जिद्द, चिकाटी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं, असं अजित पवार म्हणाले.
माझ्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ साली सुरु झाली. एकनाथ शिंदे यांची टर्म २००४ साली सुरु झाली. या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे. कारण मी १९९० च्या बॅचचा आहे. हे सर्व माझ्या नंतरच्या बॅचचे आहेत. पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. शेवटी ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या वेळेस घडत असतात. मी गंमतीने काहींना म्हणालो की, तुम्ही ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही एवढे आमदार घेऊन आलात तर मुख्यमंत्री करणार, मग मला तसं सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती. शेवटी जे नशीबात असतं तेच होत असतं. आपण आपलं काम करत राहायचं, असं अजित पवार म्हणाले.