पदभार स्वीकारताच नारायण राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
![After accepting the post, Narayan Rane castigated Chief Minister Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Narayan-Rane-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना संधी देण्यात आली असून बुधवारी त्यांचा शपथविधी पार पडला. नारायण राणे याच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली.
- संजय राऊतांच्या खोचक टीकेला उत्तर
“संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असतं. चांगलं नाही वाईटच बोलायचं असतं. संजय राऊत यांना सांगेन खातं बरं वाईट नसतं, तर काम कसं करतो हे महत्वाचं असतं. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खातं चांगलं आणि मोठं होतं असं म्हणतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
- संजय राऊत काय म्हणाले आहेत
“नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. “शिवसेनेला कोकणात फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की, त्यांना देशाची सेवा करण्याऐवजी या कामासाठी मंत्रीपद दिलं आहे. पण असं वाटत असेल ते चुकीचं आहे. मंत्रीपद राज्याचं आणि देशाचं असतं जे विकास आणि लोकांची कामं कऱण्यासाठी असतात,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.