breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चिंचवडमध्ये कांटे की नव्हे, ‘काटे से टक्कर’; आदित्य ठाकरे

चिंचवडमध्ये परिवर्तनाचे वारे; नाना काटे यांचा विजय निश्चित

चिंचवड : गद्दारांना हाताशी धरून भाजपने राज्यात घटनाबाह्य सरकार आणले आहे. या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा आक्रोश असून नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही बदलाचे वारे वाहत असून या ठिकाणी ’कांटे की टक्कर नसून काटे से टक्कर है’, त्यामुळे चिंचवडमध्येही जनताच परिवर्तन घडवून आणेल आणि नाना काटे यांना विजयी करेल, असा ठाम विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा सोमवारी (दि. 13) वाल्हेकरवाडीत संयुक्त मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पाठीत चाळीस वार करून सध्या राज्यात गद्दारांचे खोके सरकार अस्तित्त्वात आले आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि अल्पआयु ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हे सरकार निश्चितच कोसळेल याचा मला ठाम विश्वास आहे. या सरकारबद्दल राज्यातील जनतेत प्रचंड रोष, चिड आणि आक्रोश आहे. आम्ही सत्तेत असताना करोना काळात देखील शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची मदत केली होती. मात्र या सरकारच्या काळात राज्याची प्रगती थांबली असून शेतकरी आत्महत्या करत आहे. सध्याच्या राजकारण अत्यंत घाणेरडे झाले असून त्यात बदल करावा लागणार आहे. त्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणाबाजी केल्याने सभास्थळ दणाणून गेले होते.

राज्यात एकही नविन उद्योग नाही

महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात साडे सहा हजार कोटींचे नविन उद्योग आणल्याने तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली खोके सरकारने गेल्या आठ महिन्यांत एकही उद्योग आणला नाही. जे उद्योग राज्यात येणार होते, ते गुजरातला पाठविल्याने या ठिकाणच्या लाखो तरुणांना रोजगाराला मुकावे लागले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळच्या तरुणांवर अन्याय झाला आहे. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला असून हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपणाला महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानाचा खून करणारे सरकारमध्ये बसले आहेत. सध्याची लढाई ही महाशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी सुरू आहे. सरकारमध्ये बसलेल्यांची निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंम्मत नाही. ते पाठीत खंजीर खूपसून सत्तेत बसले आहेत. आपला लढा मोठा आहे. गद्दार आणि त्यांना पाठींबा देणारे भाजप या दोघांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असून चिंचवड पोटनिवडणुकीत नाना काटे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केली.

इजा, बिजा झाली आता तिजा दाखवायची आहे – अजित पवार

महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना कधीही स्विकारलेले नाही. यापूर्वी फुटाफुटीच्या राजकारणात इजा बिजा घडविणारे पुन्हा निवडून आले नाहीत. काही महिन्यांपूर्वी गद्दारी करून सरकारमध्ये बसलेल्यांना जनता स्विकारणार नसून त्यांना यावेळी तिजा दाखवायची आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
महाविकास आघाडीच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजितदादा बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना करोना काळात केलेल्या कामांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आम्ही सरकार चालविले. मात्र आता अस्तित्त्वात आलेल्या सरकारमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. भाजपकडून केवळ स्वार्थाचे राजकारण चालले आहे. देशभर सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पक्षांतर बंदी कायदा असतानाही न्यायालयात निकाल लागत नाही. प्रत्येक बाबीमध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू असल्यामुळे महाराष्ट्राच्या कारभाराचे तीन तेरा वाजले आहेत.
भाजपच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये रोषाची भावना आहे. चिंचवडची पोटनिवडणूक ही आपणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच असून त्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आदेशच अजित पवार यांनी यावेळी दिले.

अपक्ष उमेदवाराला ‘बेडका’ची उपमा

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहूल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर अजित पवार यांनी कलाटे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पाण्यातील बेडकासारखी अवस्था एका अपक्ष उमेदवाराची झाली आहे. त्याच्या पाठीमागील बोलविता धनी कोण आहे ते पहावे लागणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत १ लाख १२ हजार मते पडल्याचे दाखले या उमेदवाराकडून दिले जात आहेत. त्यावेळी हा उमेदवार आम्ही त्याला पुरस्कृत केले होते, ते विसरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दिल्यामुळेच त्याला तेवढी मते मिळाली होती. यावेळच्या निवडणुकीत या उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या, असे आवाहनच पवार यांनी यावेळी केले.

आजारी आमदारांच्या बाबतीतही भाजपचे स्वार्थी धोरण

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आमदार मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप दोघेही गंभीर आजारी असताना त्यांना मतदानासाठी रुग्णवाहिका करुन त्यांना मुंबईला मतदानासाठी नेऊन भाजपने आपला स्वार्थ साधल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आम्ही मात्र लक्ष्मण जगताप आम्हाला सोडून गेलेले असतानाही आम्ही कोणतीही कटूता न बाळगता त्यांच्यासाठी इंजेक्शनची सोय केली. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात भाजप नव्हतीच. दोन – चार शिवाय भाजपचे नगरसेवक निवडून आले नव्हते. फोडाफोडीच्या राजकारणातून पक्ष वाढवितात. भावनिक मुदा करण्याचे काही कारण नाही. ज्या व्यक्तीचे दुख:द निधन झाले. त्या व्यक्तीला राजकारणात मी सगळी ताकद दिली. रुग्णालयात दाखल असताना आवश्यचक मदतही आपणच केल्याचे पवार म्हणाले.

महाशक्तीला ताकद दाखवा – नाना पटोले

महाराष्ट्रामुळे करोना देशात पसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रावर सातत्याने त्यांची वकृदृष्टी आहे. देशाची सार्वजनिक संपत्ती विकून देश चालविला जात आहे. कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकरी, छोटे व्यापारी यांना बरबाद करत आहेत. पंतप्रधान संसदेत पान टपरीवाल्यासारखे भाषण करत आहेत. मात्र, लोकशाहीत घमंड चालत नाही. या महाशक्तीला जमिनीवर आणण्यासाठी महाविकास आघाडीची ताकद द्यावा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. भाजप वातावरण पसरविण्यात पटाईत आहे. चिंचवडमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणतीही सहानुभूती नाही. महापालिकेत भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. सत्तेची घमेंड आलेल्या लोकांना, खोके, बेईमानी करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे पटोले म्हणाले.
पालिका निवडणुकीत सर्वांना न्याय

महापालिका निवडणुकीबाबत काही काळजी करु नका, व्यवस्थित, राजकीय ताकदीप्रमाणे जागा वाटप केले जाईल. आताच्या काळात आपल्या मतांची विभागणी होणे परवडणारे नाही. एक-एक मत महत्वाचे आहे. गाफील राहू नका, गैरसमज करु नका. पोटनिवडणुकीतील विजय आपल्याला महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकदीप्रमाणे स्थान दिले जाईल, असेही पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button