शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार? राज्यात नवीन कायदा येणार?
खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
![Abdul Sattar said that strict action should be taken against black marketers in the sale of fertilisers, seeds and pesticides](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/farmer-maharashtra-780x470.jpg)
मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांत पाऊस होणार असला तरी या खरीप हंगामामध्ये पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. याशिवाय, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
राज्याच्या काही भागात सध्या पेरणी झाली असून जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचनाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘आदिपुरूष चित्रपटावर बंदी आणा’; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी
सध्या शेतकरी वर्ग पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यात व्यस्त आहे. अशावेळी त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. जिल्हास्तरावरील सनियंत्रण समित्यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. चुकीचे काम करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री सत्तार यांनी दिले आहेत.
बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही संदर्भात राज्यासाठी नवीन कायदा करण्याचा विचार सुरु आहे. देशात इतर राज्यांनी असा कायदा केला असेल तर त्याचाही निश्चितपणे अभ्यास करुन आपल्या राज्याचा कायदा अधिक कडक असेल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे धागेदोरे शोधून संबंधितांवर कडक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.