देशातल्या ७० टक्के प्रौढ लोकसंख्येने घेतला लसीचा पहिला डोस; आरोग्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली |
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी सांगितले की, भारतातील ७० टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड -१९ लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याबद्दल मांडवीय यांनी देशाचं कौतुक केलं आहे. तर देशाचा करोनाविरुद्धचा लढा असाच चालू ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. आपल्या ट्विटर संदेशात मांडवीय म्हणतात, “मजबूत राष्ट्र, जलद लसीकरण: भारताने ७० टक्के लोकसंख्येला करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, साथीच्या आजाराविरूद्धच्या लढाईत भारत नवीन ध्येय साध्य करत आहे. अशाच पद्धतीने भारताचा करोना विरुद्धचा लढा चालू राहो.
Strong Nation, Rapid Vaccination: India has administered the first dose of #COVID19 vaccination on 70% of the population.
Under PM @NarendraModi ji, India is achieving new landmarks in the fight against the pandemic.
Keep it up India, let us fight Corona 👏 pic.twitter.com/UIslHg8F09
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 4, 2021
काल दिवसभरात देशात २३ लाख ४६ हजार १७६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ९० कोटींच्या वर गेली आहे. हा आकडा आज सकाळी सात वाजेपर्यंतचा आहे. देशभरात झालेल्या ८८,०५,६६८ लसीकरण सत्रांमधून हे साध्य झाले आहे, असे मंत्रालयाने सांगितले. अधिकाऱ्यांच्या मते, २५ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस दिले गेले आहेत. ५,६७,३७,९०५ पेक्षा जास्त शिल्लक आणि न वापरलेले लसीचे डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, एका महिन्यात देण्यात आलेल्या सरासरी दैनंदिन डोसची संख्या मे मध्ये १९ लाख ६९ हजारांवरून जूनमध्ये ३९ लाख ८९ हजार आणि नंतर जुलैमध्ये ४३ लाख ४१ हजार आणि ऑगस्टमध्ये ५९ लाख १९ हजार झाली.