उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार; प्रियांका गांधींची घोषणा
![40% women candidates from Congress in Uttar Pradesh; Priyanka Gandhi's announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/priyanka-gandhi-1.jpg)
उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रियांका गांधी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा प्रियांका गांधी यांनी केली. आज लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘लड़की हूँ लड सकती हूँ’ हा नारा यावेळी त्यांनी दिला.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, “येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना देऊ. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे. महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील. प्रियांका गांधी म्हणाल्या की, ” महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसलात तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.”
- हा निर्णय सर्व महिलांसाठी आहे…
“उत्तर प्रदेशमध्ये बदलाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचं आहे. सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वतःचे रक्षण करावे. माझा निर्णय उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी आहे”, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
- उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण
प्रियंका गांधी म्हणाल्या की, “मी त्या लोकांसाठी लढत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाऱ्यांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे आहे. आज उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण होत आहे.”