‘स्वावलंबी भारत’, बापूंच्या स्वप्नाला मोदींच्या आत्मनिर्भरची झालर: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
वर्धा: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिलेली आहे. महात्मा गांधी यांच्या बापू कुटीला भेट देऊन त्यांनी आश्रमाचे दर्शन घेतले आहे. तसेच, सामूहिक प्रार्थना देखील केली. त्यांची ही भेट खासगी असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी आश्रमाच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा अभिप्राय लिहिला. “येथे आल्यावर सादगी, शांती आणि स्वात्मनिर्भरतेचा आभास होतो आहे.
येथे अधिकाधिक युवाशक्ती पोहोचली तर स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा तथा आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न साकार होईल”, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली आहे. बापू नेहमीच स्वावलंबी गाव तसेच स्वावलंबी भारताचे स्वप्न बोलून दाखवायचे. पण महात्मा गांधी यांच्या स्वावलंबी या शब्दाला आता नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर या शब्दाची झालर दिसू लागलेली आहे आणि मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत या शब्दाचा उल्लेख आज नकळत राज्यपालांच्या अभिप्रायातून प्रगट झाला आहे.