सामान्य कुटुंबातील महिला बनली जिल्ह्याची कारभारीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/zp-lady.jpg)
पुणे | महाईन्यूज
घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना तसेच राजकारणात सरपंच म्हणून गावगाडा हाकण्याचा अनुभव असणाऱ्या बहूळ (ता. खेड) येथील सर्वसामान्य कुटुंबातील रेटवडी तर्फे पिंपळगाव गटातील राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे या आता जिल्ह्याचा गाडा हाकणार आहेत. अध्यक्षपदाच्या कालावधीत शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित या सर्व घटकांसाठी काम करणार असून त्यांच्या असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवडीनंतर अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार, हे निश्चित होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. निवडीनंतर मावळे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार केला आहे. सत्काराला उत्तर देताना निर्मला पानसरे म्हणाल्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला जिल्हा परिषदेच्या अध्यपदाची संधी दिली आहे, हा या जिल्ह्यातील सर्व महिलांचा सन्मान आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा येत्या काळात प्रयत्न राहील. पुणे जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील तरुण, तरुणी, शेतकरी, आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या सोबतच जिल्ह्याचा भौगोलिक विकास आणि आणि प्रत्येक तालुक्याला समान निधी देण्याचाही प्रयत्न करणार असल्याच्या त्या म्हणाल्या आहेत.