“सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी”- शरद पवारांचं आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये सातारा-कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा काल म्हणजे ९ ऑगस्ट घेतला. यावेळी सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा देखील पवारांनी व्यक्त केली. “कोरोनाचे संकट हे अख्ख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहेत. पण सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एखाद्या छोट्याश्या अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
“कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, आपले राज्य नक्की कोरोनामुक्त होईल” असा विश्वास शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात केली आहे. या जागांसाठी मुलाखत नसणार आहे. मेरिटवर भरती करत आहोत.
मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. मात्र ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.“कोल्हापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट हा ३५ टक्के आहे तो ५ टक्क्यांवर आणायचा आहे. ग्रोथ रेट वाढतोय. बाहेरच्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी होतोय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याती गरज आहे”, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.