श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास आता CBI कडे? उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात सतत नवनवे पुरावे, थरारक खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र आता हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी जोर धरतेय. दिल्ली उच्च न्यायालयात एका वकिलाने या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. श्रद्धा वालकर हत्येचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी याचिकेतून केली आहे. दिल्ली पोलिसांचा या प्रकरणातील तपास योग्यरितीने होत नाही, तसेच दिल्ली पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, याशिवाय त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्यांची आणि उपकरणांची कमरता आहे. त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यात दिल्ली पोलीस अयशस्वी ठरत आहे, असं या याचिकेत म्हटले आहे.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होणार होती, मात्र नार्को टेस्टपूर्वी आफताबची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी प्रथम न्यायालयाची परवानगी घेतली जाईल. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर पॉलीग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टची प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण होईल.
दरम्यान श्र द्धा हत्या प्रकरणाच्या तपासात गुंतलेले दिल्ली पोलीस रविवारी तलाव रिकामे करण्यासाठी दक्षिण दिल्लीतील मैदानगढी येथे पोहोचले. आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, त्यानेच श्रद्धाचं मुंडक याच तलावात फेकले होते. मेहरौलीच्या जंगलात दिल्ली पोलिसांचा तपास तिसऱ्या दिवशीही सुरूच होता. येथून आतापर्यंत मृतदेहाचे 17 तुकडे सापडले आहेत.
यापूर्वी आरोपी आफताब पुनावालाने आपल्या गुन्ह्याची कबुली देत श्रद्धाचे तुकडे केल्याचे सांगितले, तसंच हे तुकडे जंगलात विविध ठिकाणी टाकल्याचेही त्याने कबूल केले आहे. आफताबने हा गुन्हा कसा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशापद्धतीने लावली याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना आत्तापर्यंत संबंधित जंगलातून मानली आणि जबडा सापडला आहे, ही हाडे श्रद्धाची आहेत की नाही याचा डीएने चाचणीतून शोध घेतला जाईल.