शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आदेश
मुंबई : राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आहे. यावेळी १० ऑगस्टपर्यंत शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचेवळी या योजनेंतर्गत प्रस्तावांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी मोबाईल ॲप तसेच पोर्टल तयार करण्याबाबत भुसे यांनी निर्देश दिलेले आहेत. अर्ज ऑनलाईन आल्यास त्यावरील कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले.
दरम्यान, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. तसेच या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आजपासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना लाभ. या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आजपासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम. यात लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्त करण्यासह नवीन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार- कृषीमंत्री @dadajibhuse pic.twitter.com/Gwy9kg99f2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा विशेष मोहीम राबवून १० ऑगस्टपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आलेले आहे. मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे उपस्थित होते. कृषी आयुक्त धीरजकुमार व राज्यातील कृषी सहसंचालक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले होते.