शिवसेनेच्या मुंबईवर भाजपचा ‘डोळा’; चंद्रकांत पाटील म्हणतात २०२२ ला महापौर आमचा!
मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. तसेच भाजपचे लक्ष्य मुंबईमहानगरपालिका आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईच्या महापौर बाबत भाष्य केलं आहे. ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, ‘२०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपची निर्विवाद सत्ता येईल आणि पुढचा महापौर आमचाच असेल,’ असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘३० डिसेंबपर्यंत भाजपच्या मुंबई अध्यक्षाची निवड होईल आणि त्यापूर्वी संघटनात्मक म्हणजेच प्रभाव, मंडल आणि जिल्हा अध्यक्षांची निवड होईल,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी देखील मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार, त्या दृष्टीने आमची मजबूत तयारी सुरु आहे. गेल्यावेळी आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो. पण आता मुंबईचा महापौर भाजपचा असेल, असे ते म्हणाले.