विकासकामे करूनही जनतेने अपेक्षित कौल दिला नाही, यावर चिंतन करणार – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर – विकासकामे करूनही जनतेने आम्हाला कौल का दिला नाही असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेला केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. दरम्यान महायुतीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत अपेक्षित न मिळाल्याने भाजप चिंतन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकासकामे करूनही आम्हाला जनतेने अपेक्षित कौल दिला नाही. मात्र जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आमचं नेमकं काय चुकले हे जनतेने सांगावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच भाजप-शिवसेना दोघांनाही बंडखोरी शमवता आली नाही. बंडखोरीमुळेच आम्हाला अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच उदयनराजे भोसले यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सत्ता भाजप-शिवसेनेचे येणार हे सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘अब की बार 220 पार’ असा नारा दिला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे हे स्वप्न भंगले. निवडणुकीत भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या.