वडेट्टीवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
नागपूर : काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना ज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा’ असा नारा दिला होता. यावेळी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स देखील झळकले होते.
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असे वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोला लगावला आहे. ‘भाषणामध्ये बोलण्याच्या नादात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. पण ज्या पक्षाकडे बहुमत असते त्यांचाच प्रमुख असतो’, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
नागपूरात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आपण ज्या समाजातून पुढे येतो त्यांच्या मेळाव्यात अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया येतात. मेळाव्यात टाळ्या वाढत असताना एखादे जादा वाक्य बोललं जातं.