राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपावरुन नाराजी…खातेवाटपाबाबत पक्षात उजवं-डावं केल्याची खंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-48.png)
मुंबई | महाईन्यूज |
मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपावरुन सुरू असलेल्या वादामुळे खातेवाटप लांबल्याचे बोलले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जवळच्या मंत्र्यांकडे अत्यंत महत्त्वाची खाती देण्यात आली. त्यामुळे ही राष्ट्रवादीच्या गोटात कुरबूरी आणि नाराजीचा सुर पहायला मिळतोय.परिणामी या दोन दिवसांत खातेवाटप होऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना गृह खाते मिळण्याची शक्यता असताना त्यांना कामगार खात्याची जबाबदारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. तर, निवडणूक अर्ज भरण्यावेळी तळ्यातमळ्यात असणारे विदर्भातील अनिल देशमुख यांना महत्वाचे गृह खाते दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हाच न्याय इतर नेत्यांसोबत केल्याचेही बोलले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खाते, तर वळसे यांना कामगार खाते हे गणित देखील अनेकांना खटकले आहे.