राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीत खळबळ, अखेर कृषी मंत्र्यांनी केला खुलासा
अमरावती : ‘शेतकऱ्यांच्या संदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. राज्यातील कृषी खाते झोपलं आहे का? असा घरचा अहेर देत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारवर ‘प्रहार’ केलेला होता. बच्चू कडूंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी खुलासा केलेला आहे. ‘कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे’ असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलेले आहे.
तसंच, ‘राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असंही भुसे यांनी स्पष्ट केले. परंतु, बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहण्यास मिळालेले आहे.