याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार
मुंबई | “अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत होते, तर इतकी वर्ष कारवाई का झाली नाही, याकूब मेमनच्या घरावर कारवाई केली नाही, पण कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या 24 तासात झालेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे” असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. “मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी” या नवीन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार काम करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.
“मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी करायची झाल्यास ती खूप मोठी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या वांद्रे स्थानकाशेजारील बहुमजली झोपडपट्ट्याही अनधिकृत आहेत. मग त्यावर कारवाई का झाली नाही? भाजप उद्यापासून महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी पाठवेल, आणि त्यांच्यावर 24 तासात कारवाई होते का, याचा पाठपुरावा करेल” असे आशिष शेलार म्हणाले.
“सुडाच्या भावनेने ही कारवाई होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे. कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत असेल, तर जशी तत्परता तोडकाम करताना दाखवली, तीच भूमिका इतरांच्या बाबतीतही असायला हवी” असे शेलार म्हणाले.