मोबाइल रिचार्जची दुकानं, पंख्याची आणि पुस्तकांची दुकानं सुरू राहणार
कोरोना व्हायरसच्या या लॉकडाऊनमध्ये सरकारने आणखी काही व्यवहारांना सूट दिली आहे. सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिलीय. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी, असं पत्रही गृहमंत्रालयाने २२ एप्रिलला राज्यांना पाठवलं आहे.
याशिवाय सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानंही सुरू राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याची दुकानं सुरू ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरू राहतील, असं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने या संदर्भात राज्यांना २१ एप्रिलला पत्र पाठवलं आहे. फळांची आयात- निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांना सूट दिली गेली आहे, असं गृहमंत्रालाने पत्रात म्हटलं आहे.
लाखो भारतीय मर्चंट शिपिंग जहाजांवर काम करतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांना जहाजांवर कामासाठी जाता येत नाहीए किंवा जहाजांवरून अडकले आहेत. यामुळे आपली नोकरी जाण्याची भीती भारतीयांना आहे. याची केंद्र सरकारने दखल घेतली. जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या साइन इन आणि साइन ऑफ संबंधी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. २१ एप्रिलच्या पत्रात यासंबंधी विस्तृत माहिती दिली गेलीय, असं गृहमंत्रालायने सांगितलं.