“मुंबईतील लोकल सेवेसोबत कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार”- आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Untitled-10.png)
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळ्याचं लक्ष लागलेली मुंबई लोकल पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईकरांसाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पुढील महिन्यात मुंबईतील लोकल सेवेसोबतच कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. मधल्या काळात नियंत्रणात असलेला मुंबईतील संसर्ग पुन्हा वेगानं पसरू लागला आहे. असं असलं तरी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. उलट ‘अनलॉक’वर भर देण्यात येत असून मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेली लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत लोकल पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
‘सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. यात हळूहळू विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जात आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाशी त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. लोकलच्या अधिक फेऱ्या सुरू झाल्यानंतर अधिक लोकांना परवानगी देता येईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासोबत अन्य काही गोष्टींना परवानगी दिली जाणार आहे,’ असं आदित्य म्हणाले. ‘अनलॉकचा वेग कमी आहे. ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. एकदा सुरू झालेली गोष्ट पुन्हा बंद करावी लागू नये असा आमचा प्रयत्न आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.