‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीमेबद्दल पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढवा
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उपनगर जिल्ह्यातील सहायक आयुक्तांशी संवाद साधून आढावा घेतला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हौसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करून करोनाच्या संसर्गावर मात करण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. उपनगर जिल्ह्यात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिल्ह्यातील बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त, सर्व १५ वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने उपनगर जिल्ह्यात महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.
करोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. करोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर भर देणे गरजेचे आहे. तसेच हाऊसिंग सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्या आदी सर्व ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, स्वच्छता आदीबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जनजागृती करावी. महापालिकेनेही वॉर रुम आणि इतर संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्ती यांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य माहिती द्यावी. नवरात्रीचा सणही लवकरच येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.