“माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपाचं राजकारण आहे”; राऊतांचा भाजपाला टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sanjay-raut-shaha-modi.jpg)
“भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळालेलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं भाजपाचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सध्याचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. यावेळी त्यांनी भाजपावरही टीका केली आहे.
- महाविकास आघाडी सरकारचं प्लॅनिंग कसं?
राज्यामध्ये सध्या असलेले महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण विचार करुनच सत्तेत आले आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. “आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्युब बेबी नाही. हे व्यवस्थित जन्माला घातलेलं सरकार आहे आणी याबद्दल आम्ही बऱ्याच आधीपासून प्लॅनिंग केलं होतं,” असंही राऊत यांनी सांगितलेलं आहे.
- काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?
राज्यामध्ये महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षासंदर्भात भाष्य करताना भाजपा दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती असंही राऊत यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. “भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं राजकारण सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘मंत्रीमंडळामधील खाणारी खाती आमच्याकडे ठेवली नाहीत,’ असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.