breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची सामानातून भाजपवर जहरी टीका, म्हणाले…

मुंबई: देशावर कोरोनाचं संकट असताना भारत आणि चीनमध्ये सीमेरेषेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला आहे. अशात राज्यात राजकीय वातावरणही तापलं आहे. या सगळ्या मुद्द्यांवरून शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजपवर जहरी टीका करण्यात आलेली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन वादावरही यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य दाखवलं असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावर ‘महार, मराठे, राजपूत, शीख, गोरखा, डोगरा रेजिमेंट्स सीमेवर तंबाखू मळत बसले होते का?’ असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. काल पुलवामा इथं महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले. पण बिहारमधील निवडणुकांमुळे सैन्यात ‘जाती’ आणि ‘प्रांत’ चं महत्त्व सांगितलं जात आहे. या प्रकारचे राजकारण कोरोनापेक्षा वाईट आहे असल्याची टीका सामनातून केली जात आहे.

या सगळ्यात महाराष्ट्रात विरोधी पक्ष खाजवण्यात व्यस्त आहे. त्यांना याबद्दल काहीही पडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर गावागावात चपलेनं मार खाण्याची वेळ आली आहे. ते कधी सुधारतील माहित नाही? अशी घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात,

लडाखमधील गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही.

गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. या गोपीचंदाच्या अनेक करामती पडद्यावर दिसल्या. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून या गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली आहे व त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपचे गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या गोपीचंदने टाकल्या. ‘श्री. पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले’, असे हे गोपीचंद महाशय म्हणतात. ‘पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही’, असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत. गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले. पडळकर यांनी पवारांबाबत केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे आज

भाजपच्या बिळात

शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले. पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली. ‘भाजपला मत देऊ नका. मी भाजपसाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,’ असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपमध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार आलेच हेते व धनगर आरक्षणाचा ठराव पहिल्याच कॅबिनेटमध्ये करू असे वचन भाजपचेच होते, हे गोपीचंद कसे विसरले? कोणताही अभ्यास, संदर्भ, जनमत पाठीशी नसलेले लोक भाजपने भरती करून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे ती अशी! शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते.

लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पण पवारांसारख्या ज्येष्ठांवर अशा घाणेरड्या शब्दांत टीका करणार्‍यांनी स्वतःचे पाय कोठे आहेत, आपली लायकी काय याचे आत्मपरीक्षण आधी करावे. पवारांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना राजकारणात पुढे आणले. तसे नसते तर दिवंगत आर.आर. पाटील तसेच जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे ही नावे राजकारणात तळपताना दिसली नसती. पवारांच्या मंत्रिमंडळाचा तोंडवळा हा बहुजनांचाच राहिला आहे . बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तळागाळातील बहुजन समाजाला राजकारणात मानाचे पान दिले. त्यामुळे 60 ते 70 वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी

वाचाळकी

करणे हे मूर्खाचे लक्षण तर आहेच, पण मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाशी भाजपचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्‍यांपासून मात्र स्वतःला झटकतात. मागे पंढरपूरचे एक भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनीही सीमेवरील सैनिकांच्या पत्नींबाबत खालच्या पातळीवरचे विधान केले होते. एकप्रकारे ती सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची मानखंडनाच होती. त्या आमदारालाही भाजपने आधी झटकले आणि पुन्हा जवळ केले.

गोपीचंदच्या बाबतीतही तेच घडेल. गोपीचंदच्या विधानांशी भाजपचा संबंध नाही, पण गोपीचंद मात्र आमचेच! कालपर्यंत महादेव जानकर तुमचे होते. जानकरांच्या मुखातून पवारांवर टीका केली. आता जानकर नकोसे झाले. कारण ते मुंडेनिष्ठ आहेत. हेसुद्धा जातीय राजकारणच आहे. पवार हे लहान समूहांचा वापर करतात असे गोपीचंद म्हणतात. मग गोपीचंद यांना भाजपने आमदार का केले? हेदेखील लहान समूहांना वापरण्याचे राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले. लडाखमधील गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले.

देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button